उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून ती अधिक भयानक होत चालली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आली आहे. काही गुंडांनी एका पत्रकारावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी या घटनेवर संताप व्यक्त करत योगी सरकरवर टीका केली आहे.
वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज, असा टोला राहुल गांधींनी योगी सरकारला लगावला आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, आपल्या भाची सोबत होणाऱ्या छेडछाडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या संवेदना शोकाकूल कुटुंबासोबत आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
अपनी भांजी के साथ छेड़छाड़ का विरोध करने पर पत्रकार विक्रम जोशी की हत्या कर दी गयी। शोकग्रस्त परिवार को मेरी सांत्वना।
वादा था राम राज का, दे दिया गुंडाराज।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 22, 2020
नेमकं प्रकरण काय आहे?
गाझियाबाद मधील विजयनगर भागातून पत्रकार विक्रम जोशी आपल्या बाईकवरून मुलीसोबत जात होते. यावेळी काही गुंडांनी मागून येऊन जोशी यांना घेरलं. त्यांना मारहाण करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार जोशी यांच्या मुलीच्या डोळ्यादेखत घडला. गोळ्या झाडल्यानंतर गुंडांनी येथून पळ काढला. तसंच हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जोशी यांना आपल्या भाचीसोबत झालेल्या छेडछाडीची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यामुळे हा हल्ला झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या घटनेवर राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला असून राजकारण आणखी तापलं आहे.