गेल्यावर्षी केरळमध्ये पसरलेल्या निपाह विषाणूने पुन्हा डोकेवर काढले आहे. केरळमध्ये एका २३ वर्षीय तरुणाला निपाह विषाणूंची बाधा झाली असून ३१२ संशयित आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने केरळ सरकारला निपाह विषाणूंची साथ रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केली आहे. तसेच लोकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी एका २३ वर्षीय तरुणाच्या शरिरात निपाह विषाणू आढळल्याला पृष्ठी दिली आहे. या २३ वर्षी तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो कोची येथील इर्नाकूलमचा रहिवाशी आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील वायरॉलॉजी संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या विद्यार्थ्याला आवश्यक तो औषधोपचार देण्यात येत आहे.
शैलजा म्हणाल्या की, केरळसारखा निपाह विषाणूच्या साथीविरोधात लढण्यासाठी पूर्णत: तयार आहे. राज्यातील अनेक इस्पितळांमध्ये आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आले आहे. ज्या रुग्णांमध्ये निपाह विषाणूंची लक्षणे आढळतात त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. असे तब्बल ८९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारची ६ सदस्यांची एक टीम केरळमध्ये आली असून ती परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे या टिममधील सदस्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
निपाह विषाणू हा वटवाघळाच्या माध्यमातून पसरतो. वटवाघळाने खाल्लेल फळ तर मनुष्याने खाल्ले तर त्या व्यक्तीच्या शरीरात हा निपाह विषाणू शिरतो. निपाह विषाणू संसर्जजन्य आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरात निपाह विषाणू आहे त्याच्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्यांच्या शरिरात तो शिरतो. १९ मे २०१८ ला केरळमधील कोझीकोडे येथे या विषाणूची साथ पसरली होती. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.