नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला आणि राजकीय पक्षांच्या धावपळीला सुरुवात झाली. देशात सात तर राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर सत्ताधारी तसेच विरोधकांनीही सोशल मीडियावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असल्याचे सांगत पुढचा कार्यकाळ देखील आमचाच असेल असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकशाही वाचवायची असेल तर ही अखेरची संधी असल्याचे म्हटले आहे.
हाथ बदलेगा हालात
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत लोकशाही तसेच राज्यघटना हुकूमशाहीपासून वाचवायची असेल तर या निवडणुका ही अखेरची संधी असल्याचे म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आपल्या पक्षाचं काम सांगायला ते विसरले नाहीत. हाथ बदलेगा हालात असं म्हणत या निवडणुकीत काँग्रेसला संधी द्या, तरच तुमची परिस्थिती बदलेल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुका भारतासाठी परिवर्तनाची संधी घेऊन आल्या आहेत. यामुळे परिवर्तन करा आणि हुकूमशाहीला उलथवून टाका, असं आवाहनही खर्गे यांनी केलं आहे. आम्हाला संधी दिलीत तर आम्ही द्वेष, लूट, बेरोजगारी, महागाई आणि अन्याय – अत्याचाराविरोधात लढू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.
2024 लोकसभा चुनाव भारत के लिए ‘न्याय का द्वार’ खोलेगा।
लोकतंत्र एवं संविधान को तानाशाही से बचाने का शायद ये आख़री मौक़ा होगा।
‘हम भारत के लोग’ साथ मिलकर नफ़रत, लूट, बेरोज़गारी, महँगाई व अत्याचार के ख़िलाफ़ लड़ेंगे।
हाथ बदलेगा हालात
2024 Lok Sabha elections will open the…
— Mallikarjun Kharge (@kharge) March 16, 2024
मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू
काँग्रेसपाठोपाठ शिवसेना – उद्धव गटाने देखील निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. देशाला आणि नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गॅरंटी देणारे मोदी पारदर्शक पद्धतीने निवडणुका होण्याची गॅरंटी देऊ शकतात का, असा सवाल उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मुळात मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. गेल्या काही काळातील त्यांच्या निर्णयावरून हे स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे निवडणुका पारदर्शक करण्याची गॅरंटी मोदींनी घ्यावी, असे आवाहनही राऊतांनी केले. मुळात या देशातील राजकीय पक्षांचा, लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही, तरीही आम्ही त्याच्या साहाय्याने निवडणुकांना सामोरे जात आहोत, त्यामुळे तर पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी आणखी गरजेची असल्याचेही ते म्हणाले. अन्यथा, निवडणूक आयोग देखील इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुलं झालं आहे का, असा प्रश्न पडेल.
हेही वाचा – Election 2024 : लोकसभेबरोबरच विधानसभांच्या 26 जागांसाठी पोटनिवडणूक, अकोला पश्चिमची कधी?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी देशवासीयांना एक खुले पत्र लिहिले होते. निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी विकसित भारतासाठी नागरिकांकडूनच सूचना मागवल्या होत्या. तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही लागलीच त्यांनी एक ट्वीट केले. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशासाठी आम्हाला खूप काम करायचे आहे. अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेली खोल दरी भरून काढण्यात आमची 10 वर्षे गेली. या 10 वर्षांत आपला भारतही समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो, असा आत्मविश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. आमचा पुढील कार्यकाळ या संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग आणखी प्रशस्त करेल, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा – Lok Sabha Election Dates : जाणून घ्या, महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान?