मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला दुष्काळाच्या सर्वाज जास्त झळा सोसाव्या लागतात. या जिल्ह्यात दुष्काळामुळे लोकांची बिकट परिस्थिती आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे या भागातील अनेक गावं ओस पडली आहेत. अशातच आज लातूरमध्ये दुष्काळाचे तीन बळी गेले आहेत. औसा तालुक्यातील आलमता गावामध्ये आडातील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये बाप लेकांसह पुतण्याचा समावेश आहे.
फारुख मुलानी(४५ वर्ष), सदादम मुलानी (२३ वर्ष) आणि सय्यद मुलानी (२७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण आलमला गावामध्ये असलेल्या आडातील गाळ काढण्यासाठी उतरले होते. मात्र ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी आडामध्ये उतलेले इतर ४ जण जखणी झाले आहेत. गावकऱ्यांनी पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने ४ जणांचे प्राण वाचवले. या चौघांना पुढील उपचारासाठी लातूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आलमलामधील धोतरपट्टी भागात एका विहिरीचा छोटासा आड तयार करुन त्यात पाणबुडी वीज पंप टाकण्यात आला होता. मात्र या अरुंद आडात गाळ आणि कचरा असल्याने तसंच तो पाणबुडीला अडकत असल्याने तो काढण्यासाठी सद्दाम फारुख मुलानी हा तरुण आडात उतरला. मात्र त्याची हालचाल होत नसल्याने त्याचा चुलत भाऊ सय्यद मुलानी हा आडात उतरला. दोघांच्याही काही हालचाली येत नसल्याने शेवटी फारुख मुलानी आडात उतरले आणि या तिघांचा देखील गुदमरुन मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेले तिघे जण एकाच कुटुंबातील असून घरातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूमुळे मुलानी कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या तिघांच्या मदतीसाठी गावातील काही तरुण आले. त्यांच्या मदतीसाठी म्हणून सुशांत महिशंकर बिराजदार, शाहीद कमाल मुलानी, योगेश उमाशंकर हुरदळे, मल्लिनाथ बसवेश्वर अंबुलगे हे तरुण आडात उतरले. मात्र आडामध्ये उतरत असताना त्यांना देखील गुदमरल्यासारखे होऊ लागले. त्यानंतर गावकरी, पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी एका ट्रॅक्टर हालरच्या पंख्याची हवा निर्माण करुन त्या सर्वांना वर काढले. या सर्वांवर सध्या लातूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.