सरकारची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधून ७७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) साठी अर्ज दाखल केले होते. आर्थिक मंदी असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल)ने आर्थिक मदतीची केंद्र सरकारने घोषणा केल्याच्या आठवड्याभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली होती. यानुसार बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ७७ हजारांवर पोहोचला आहे.
बीएसएनएलमध्ये साधारण १ लाख ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएसच्या रांगेत आहेत. ३ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. मात्र, या योजनेनंतर कंपनीतील कर्मचारी ३१ जानेवारी २०२० रोजी आपापल्या पदावरून सेवानिवृत्त होणार आहेंत.
अशी आहे सेवानिवृत्तीची योजना
- वयाची ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ‘बीएसएनल’च्या कर्मचाऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार
- सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणाऱ्या रकमेत २५ टक्के अधिक लाभ कंपनीकडून मिळणार
- कर्मचाऱ्यांना हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार
- ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५६ वर्षे असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा ४० महिन्यांचे वेतन दिले जाणार
- पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार