घरमहाराष्ट्रयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर येत्या विधानसभेकडे त्यांचे प्रमुख लक्ष आहे. या विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्याची चौथी पिढी आता सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारण प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर युवा सेनेने केलेली मागणी समाज माध्यमांवर चर्चेत आहे.गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदार संघाची चाचपणी सुरु आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोगेश्वरी, ते स्वतः राहात असलेला खेरवाडी (वांद्रे पूर्व), माहीम, वरळी आणि शिवडी या मतदार संघाचा प्रामुख्याने विचार झाला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहीम या दोन मतदार संघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहीम माहीममध्ये सदा सरवणकर हे पक्षाचे आमदार आहेत. सत्तेच्या राजकारणात पूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा रिमोट कंट्रोल चालायचा. आता बाहेरून कंट्रोल ठेवण्यापेक्षा, थेट संसदीय राजकारणात येण्याची ठाकरेंच्या चौथ्या पिढीची महत्वाकांक्षा आहे. चौथ्या पिढीतील आदित्य ठाकरेंना संसदीय राजकारणात रस आहे.

- Advertisement -

म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पर्यावरण, शिक्षण, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. अलीकडे संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात पाहुणे म्हणून त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. युवा सेनाप्रमुख म्हणून शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता पक्षात अगदी तरुण वयात त्यांना नेतेपदी बढतीही मिळाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ते एनडीएच्या बैठकांना उपस्थित राहातात. तसेच पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, संकल्पना, दिशा ठरवताना आदित्य यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

आदित्य यांनी केंद्रीय राजकारणात छाप पाडावी अशी भूमिका असलेला एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. परंतु तसे काही घडले नाही, पण उद्धव ठाकरे यांनी आदित्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील असे संकेत त्यावेळी दिले होते. आणि आता युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी आदित्यने विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी समाजमाध्यमांत केली आहे. त्यामुळे यचर्चेला अधिक उधाण आले आहे. वरुण सरदेसाई हे आदित्यच्या खास गोटातील असून आदित्यच्या सांगण्यानुसारच त्यांनी ही पोस्ट समाजमाध्यमावर करून एक राजकीय जनमत आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

यापूर्वी 2014 साली लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ’या मला तुमच्याशी काही बोलायचे आहे’ अशी साद कार्यकर्त्याना घालत, विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. पण नंतर राजकीय डावपेचातील संभाव्य धोके लक्षात घेत त्यांनी आपली घोषणा मागे घेतली होती. आता आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आदित्य निवडणूक लढवतात की काकांप्रमाणे त्यांचीही केवळ चर्चा करते याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -