कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ऐनवेळी एमपीएससीच्या पूर्व परिक्षेची तारीख बदलण्यात आली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूरमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर विरोधकांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात उडी घेत सरकारची पुरती गोची केली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत परीक्षा आठ दिवसात होईल असे जाहीर केले. पण त्यावरही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे अखेर आज शुक्रवारी एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार असे जाहीर करण्यात आले. पण या सगळ्या गोंधळात भाजपने सरकारला घेरले असून हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टि्वटमध्ये करत महाविकास आघाडीतील सावळ्या गोंधळावरच टीका केली आहे.
त्याचबरोबर एमपीएससी परीक्षेच्या तारखांबद्दल बोलताना मंत्री वडेट्टीवर यांनी माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्याचाही भातखळकरांनी समाचार घेतला. राज्यातले सचिव मंत्र्यानाही जुमानत नाहीत का एवढं दुबळ सरकार आहे का .हे राज्य कोण चालवतं आहे महाविकासआघाडी ती सचिव मंडळी असा सवाल केला आहे.
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे असे मंत्री वडेट्टीवार म्हणतात याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत एवढं हे दुबळं सरकार आहे असाच होतो… हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2021
एल्गार परिषदेत हिंदू विरोधी विधान करणाऱा शरजिल उस्मानी पुण्यात येऊन गेला. पण त्याबद्दल सरकारला माहित नाही. यावरही भातखळकर यांनी सरकारला फैलावर घेतले आहे. शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे सिद्ध झाल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.