औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने लोककल्याणाची कामे केली. गरिबांसाठी मौल्यवान अशी कामगिरी भाजप सरकारने केली, असे फडणवीस म्हणाले आहेत. आजच्या मेळाव्या निमित्ताने शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळावी, यासाठी खोतकर प्रयत्न करत होते. परंतु, युती झाल्यामुळे रावसाहेब दानवे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अर्जून खोतकर नाराज झाले होते. आज त्यांची नाराजी दूर झाली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘हा देश राहिला तर आम्ही राहू, या भावनेने आपण लढत आहोत. राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात आपण बदल करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे ‘गरिबी हटावो’चा नारा दिला जायचा. पण, खऱ्या अर्थाने तसं व्हायचं नाही. गरिबी हटली नाही. कारण, राजीव गांधी एकदा म्हटले होते की, आम्ही १ रुपया लागू केला तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत १५ पैसे पोहचतात. कारण ८५ पैसे व्यवस्था खाऊन जाते. परंतु, मला आनंद आहे की, मोदींनी अशी व्यवस्था उभी केली की, व्यवस्था ही गरीब कल्याणाची व्यवस्था ठरली पाहिजी. जी देशातील गरिबांपर्यंत पोहोचली पाहिजे. जनधन सारख्या योजनेच्या माध्यमातून ३४ कोटी गरिबांचे खाते उघडले गेले. ज्या गरिबांनी ६० ते ६५ वर्षांपासून बँकेचे तोंड देखील बघितलं नव्हतं, त्याचं खात उघडलं गेलं. गरिबाच्या घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून मिळालं आणि गरिबांच्या घराचं स्वप्न मोदीजींनी पूर्ण झालं. मोदींनी सांगितलं आहे की, २०२२ पर्यंत या देशात सर्व लोकांचे स्वत:चे घरे होतील.’