घरमहाराष्ट्रशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; २५ जानेवारीच्या लॉंग मार्चमध्ये बाळासाहेब थोरात होणार सहभागी  

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; २५ जानेवारीच्या लॉंग मार्चमध्ये बाळासाहेब थोरात होणार सहभागी  

Subscribe

मुंबईत २३ ते २५ जानेवारी या कालावधीत आंदोलन आयोजित केले आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारी या कालावधीत आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवला असून २५ तारखेला आझाद मैदान येथून राजभवनवर काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती काँग्रेस नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी दिली. ‘दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून काँग्रेस नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत,’ असे नसीम खान म्हणाले.

या कायद्यांना कायमच विरोध

‘मोदी सरकारने शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या हातचे गुलाम बनवण्याचे काम या कृषी कायद्याच्या माध्यमातून केले आहे. या काळ्या कायद्यांना काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. संसदेतही राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस खासदारांनी या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत देशभर काँग्रेसने आंदोलने केली आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलनांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. केंद्र सरकारचे जुलमी कायदे महाविकास आघाडी सरकार राज्यात लागू करणार नाही,’ असेही नसीम खान यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -