मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेनेच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृह, हॉटेल्समध्ये मास्क न लावता प्रवेशही देण्यात येणार नाही. तसेच शासकीय, सामाजिक, धार्मिक सभांनाही बंदी घालण्यात आली आहे. विवाहसोहळा जास्तीतजास्त ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडू शकणार आहे. तर अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य
त्याचप्रमाणे मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता ऑफिसेस ५० टक्के क्षमतेनेच सुरु ठेवता येणार आहेत. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांवर तासाला उपलब्ध जागेचा अंदाज घेऊन गर्दी होणार नाही अशा पद्धतीनेच भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध घालून दिले आहेत.