वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, याकरता देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन येत्या १४ एप्रिलला संपत आहे. मात्र, हा लॉकडाऊन उठवला जाणार की वाढवला जाणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र, दुसरीकडे या कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाऊन वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी कोरोनाबाबत संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढवाव, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात लॉकडाऊन वाढणार
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली आहे. आज राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईचा आकडा ७२ इतका आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – धक्कादायक : मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू