‘काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजबसोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलं आहे. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली’, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शनिवारी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
हेही वाचा – बेळगाव मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची पावलं उचलायला सुरुवात!
योग्य वेळ आल्यावर सांगेन – फडणवीस
‘अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याअगोदर अजित पवार यांनी माझं राष्ट्रवादीच्या इतर आमदारांसोबत बोलणं करुन दिलं होतं. त्यामुळं आम्ही अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य ते योग्य वेळ आल्यावर सांगेन. याशिवाय सरकार स्थापन करण्याच्या त्यादिवशी रात्री नेमकं काय घडलं, याबाबतही योग्य वेळ आल्यावर सविस्तर सांगेन’, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळी – फडणवीस
‘मी पुन्हा येईन ही कवितेची साध ओळ आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी तिचा मी उल्लेख केला. लोकांना ही ओळ आवडली. त्यात कोणताही गर्व नव्हता आणि दर्पही नव्हता’, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा – तर सगळ्यांसमोर पुरावे जाहीर करीन; एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा!
अशा घडल्या घडामोडी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन व्हायला साधारणत: महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागला. भाजपसोबत युती तुटल्यामुळं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदीनं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होती. मात्र, अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. मात्र, तिनही पक्षांनी एकत्र येऊन परिस्थितीला सामोरे जायचं ठरवलं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना परत पक्षात येण्याचं आवाहन केलं. यात राष्ट्रवादीला यश आलं आणि अखेर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकार पूर्णपणे कोसळलं आणि फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.