हैद्राबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या पाशवी आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचे पडसाद अवघ्या देशात उमटले. दिल्लीतील निर्भया, मुंबईतील शक्ती मिल, या घृणास्पद घटनांनंतर हैद्राबाद राज्यात एका महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार आणि हत्या करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध आणि श्रद्धांजली देशभरातून वाहण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादीच्यावतीनेही निर्भयालाला कँडल मार्च काढीत श्रद्धांजली वाहिली. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.
‘अमित शहा यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा’
‘देशभरात अशा पाशवी बलात्काराच्या घटनांची मालिकाच घडत आहे. मात्र त्यापैकी घृणास्पद घटनांमध्ये दिल्लीची निर्भया, मुंबईची शक्ती मिल आणि हैदराबादमधील रंगारेड्डी तालुक्यातील घटना पाहता शासनाचा आणि कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. रामराज्य आणू पाहणाऱ्या अमित शहा यांच्या काळात रावण राज्याची प्रचिती येत आहे. याची जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा’, अशी मागणी कँडलमार्च दरम्यान राष्ट्रवादीचे मोहसीन शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेख यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या शासकीय विश्राम गृह ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असा कॅंडलमार्च काढून डॉ. प्रियंका यांना श्रद्धांजली वाहिली. या कॅंडलमार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक हातात घेऊन महिला पुरुषांनी कॅंडलमार्चमध्ये सहभाग घेतला.