घरमहाराष्ट्रMaharshtra Budget 2021: रडगाणं न गाता सर्वांसाठी दिलासा देणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री

Maharshtra Budget 2021: रडगाणं न गाता सर्वांसाठी दिलासा देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

Subscribe

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच स्तरातील घटकांना दिलासा देणार हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि वित्त राज्य मंत्री शंभुराज देसाई यांचं अभिनंदन केलं. मागिल वर्ष आव्हानात्मक आहे. कोणतंही रडगाणं न गाता सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

कोणतंही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीत अर्थसंकल्प मांडला. महिला दिनाच्या कोरड्या शुभेच्छा दिल्या नाहीतत. कृषी, उद्योग, दळवळण क्षेत्राला गती देण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प मांडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. मात्र, कोणतंही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे. प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र कधीच थांबणार नाही

देशात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात असतांना महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम जाणवणारच होता. संपूर्ण आर्थिक वर्षात जवळपास आठ महिने राज्याच्या स्थुलराज्य उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारी उद्योग आणि सेवा क्षेत्रासारखी महत्वाची क्षेत्रे टाळेबंदीमुळे बंद होती त्याचा परिणाम ही राज्य अर्थव्यवस्थेवर झाला असला तरी महाराष्ट्र कधीच थांबला नाही आणि थांबणारही नाही. टाळेबंदी उठवल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रातील अर्थचक्र गतिमान झाले असून भविष्यात कोरोनाचे संकट कमी झाले तर महाराष्ट्र पुन्हा आपल्या सर्व सामर्थ्यानिशी भरारी घेईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी व्यक्त केला.

आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास

आरोग्यसेवा, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, नवीन वैद्यकीय महाविद्यालये प्रत्येक जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड पश्चात्त समुपदेशन केंद्रे अशा अनेक निर्णयांद्वारे आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न अर्थसंकल्पातून झालेले दिसतात.

- Advertisement -

वेळेत पिक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना बिनव्याजी कर्ज

ज्या शेतीने राज्य अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला त्या शेती क्षेत्रास आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत. यात ३ लाखापर्यंतचे पिककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजदराची योजना ही अतिशय महत्वाची आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मजबूत करणारी योजना निश्चितपणे शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल. शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी अखंडित वीज पुरवठा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, कृषी उत्पादनांना हमी नाही तर विकेल तेच पिकेलच्या माध्यमातून हमखास भाव मिळवून देण्याचे शासनाचे प्रयत्न भविष्यात या क्षेत्राला अधिक बळकटी देतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या यामध्ये फक्त महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांकशुल्कात १ टक्क्यांची कपात करणारी “राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना” घोषित झाली. यामुळे महिला खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी होण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थिंनींना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुलींची शैक्षणिक गळती थांबण्यास मदत होईल असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेली संत जनाबाई सामाजिक सुरक्षितता योजना, तेजस्विनी बस संख्येत वाढ, राज्य राखीव महिला पोलीसाची स्वतंत्र तुकडी यासारखे महत्वाचे निर्णय ही आजच्या अर्थसंकल्पातून घेण्यात आले आहेत.

पर्यटनातून विकास

राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या आणि रोजगार संधींचे निर्माण करणाऱ्या उद्योग, व्यवसाय, पर्यटन यासारख्या क्षेत्रांना आपण सवलती आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्लग अँड प्ले सारख्या नावीन्यपूर्ण कल्पना आपण राज्यात राबवित आहोत. पर्यटनातून रोजगार संधी विकसित करण्यासाठी या क्षेत्राला आदरातिथ्यचा दर्जा देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय या शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले. शासनाने कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हेन, बीच शेक्स, लोणार सरोवराचा विकास, गड किल्ल्यांचे संवर्धन, वन विकास यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील.

पायाभूत सुविधांचा विकास

कोरोना काळात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख रोजगाऱ़ निर्मितीमुळे राज्यातील उद्योगाला मोठी चालना मिळेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पायाभूत सुविधांचे मेट्रो जाळे राज्यातील शहरांमध्ये बळकट करण्यात येत आहे. मेट्रो कोच,वरळी शिवडी उन्नत मार्ग असो की एमटीएचएल प्रकल्प, आपण सर्वच कामांना गती दिली आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आपण मेपासून सुरु करत आहोत, या महामार्गाला मराठवाड्यातून जोड रस्ते देखील बांधण्यात येत आहेत. रेवस-रेड्डी मार्ग , पुणे –नागपूर मेट्रोची कामे वेगात होत आहेत या सर्व प्रयत्नातून राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुण्याबाहेरून जाणारा चक्राकार मार्ग असेल, रस्ते, विमानतळ, जलमार्ग, जलद रेल्वे विकास, ग्रामीण आणि शहरी भागातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामासाठी दिलेला निधी असेल या सर्वच बाबींसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूदी आहेत. मुंबई विकासाच्या अनेक प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ शासकीय कार्यालये, शिवराज्य सुंदर ग्राम सारख्या नवीन योजनाही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

आदिवासी, उसतोड मजुरांना दिलासा

उसतोड मजुरांसाठी कल्याणकारी योजनेमुळे या मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आदिवासी आश्रमशाळाना मॉडेल शाळांमध्ये रुपांतर केले जाणार आहे. कातकरी, गोंड आदिवासी समाजासाठी एकात्मिक वसाहती या देखील त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी ठरेल. डोंगरी विकास, धनगर वस्त्यांसाठी वाढीव निधी दिला आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, प्राचीन मंदिरांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प की विशिष्ट भागाचा? – देवेंद्र फडणवीस

राज्याचा अर्थलंकल्प मांडण्यात आला असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचं की काही विशिष्ट भागाचा म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अर्थसंकल्पातून निराशा झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा – Maharshtra Budget 2021: परिवहन क्षेत्रासाठी मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -