राजकीय नेत्यांची बेताल वक्तव्य काही नवीन नाहीत. मग ते रावसाहेब दानवे असो वा गिरीष बापट. मात्र आता या भाजपाच्या नेत्यांसोबत शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची भर पडली आहे. या नेत्याने ज्यांनी वर्षांनुवर्षे लालपरीच्या माध्यमातून या महाराष्ट्राची सेवा केलीय त्यांच्या बाबतच धक्कादायक विधान केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढलेत की, ते आता वेडे झाले आहेत असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. हा नेता दुसरा तिसरा कुणी नसून परिवहन मंत्री दिवाकर रावते हे आहेत. औरंगाबादमध्ये शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान एक करार करण्यात आला. त्या दरम्यान दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
काय म्हणालेत दिवाकर रावते
एसटी महामंडळामध्ये पगाराचे, कामाचे असे अनेक प्रश्न असल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ‘कुणी सांगितलं तुम्हाला. कुठल्या सालात जगता आपण? नाही कुठल्या सालात जगता आपण एवढचं विचारायतोय मी तुम्हाला. कारण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत. आणि ते एवढे वाढले आहेत की, तेच आता वेडे झाले आहेत. आणि मी हे अधिकृतपणे बोलतोय’ असं उत्तर रावतेंनी यावेळी दिले.