मुंबईच्या कोस्टल रोडच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्या हस्त पूर्ण झाला. यावेळी बोलताना मुंबईच्या कोस्टल रोडवरून कुणीही राजकारण करू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मनसेला टोला हाणला. दरम्यान, मुंबईच्या कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही. अशी घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचं समाधान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या लोकांना कोस्टल रोडबद्दल शंका आहेत त्या सर्व पूर्ण केल्या जातील असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला मुंबईचे आयुक्त अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह इतर पदाधिकारी देखील हजर होते. भूमिपुजनाच्या कार्यक्रमावर भाजपनं बहिष्कार टाकला होता. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडसाठी मुंबई महापालिकेला परवानग्या वेळेत मिळाल्या. तसेच कोस्टल रोड विक्रमी वेळेत पूर्ण करणार अशी देखील घोषणा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना भकास करून विकास करणार नाही असं आश्वासन देखील कोळी बांधवांना दिलं. मुंबईची पारदर्शकता जगानं पाहिली असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला देखील जोरदार टोला हाणला.
कोळी बांधवांचा विरोध
दरम्यान, वरळीतील कोळी बांधवानी मात्र या कोस्टल रोडला विरोध केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देत स्थानिक जनतेचे काय म्हणणे जाणून घेतले. “आडमुठेपणा करत कोस्टल रोड लादला जाऊ नये, स्थानिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे.”, असा इशाराच राज ठाकरे यांनी आज दिला. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे.