मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले असले तरी ते साखळी उपोषण करणार आहेत. कारण ते अद्यापही सगेसोयरे आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यासाठीच ते येत्या दोन ते तीन दिवसात उपचार घेऊन मराठा बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी समाजाकडून एकीकडे विरोध होत असला तरी दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर सूचक ट्वीट केले आहे. (OBC will come with you for reservation Indicative statement of Prakash Ambedkar)
हेही वाचा – Devendra Fadnavis : कुणी कुणाची आईबहीण काढली तर…; एसआयटी चौकशीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये “…तर ओबीसीही तुमच्यासोबत येईल” या मथळ्याखाली प्रकाश आंबेडकर म्हणतात की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी तुमच्यासोबत येऊ शकेल. पण आरक्षणाचे ओबीसींचे ताट वेगळे आणि मराठ्यांचे ताट वेगळे अशा पद्धतीने एकत्र या, असे आमचे जरांगे यांना आवाहन आहे.शिवरायांनी एक बलाढ्य राज्य निर्माण केलं. त्यांच्यासोबत अलुतेदार, बलुतेदार होते. ते सैन्यात नसले तरी ते सैन्याप्रमाणे काम करीत होते, हे ध्यानात घ्या.
…तर ओबीसीही तुमच्यासोबत येईल.
: @Prksh_Ambedkar pic.twitter.com/OJ6XBNzl2W
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 26, 2024
हेही वाचा – Maharashtra Budget Session : ‘या’ गोष्टींवरून थोरात-नार्वेकरांमध्ये जुगलबंदी
जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार
दरम्यान, मनोज जरांगे यांनी रविवारी (25 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख करताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. याच मुद्द्यावरून आज भाजपा आमदार आशिष शेलार हे विधानसभेत मनोज जरांगे यांच्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणाची आणि त्यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.