घरमहाराष्ट्रपोलीस भरतीच्या बदलांविरोधात युवकांमध्ये संताप

पोलीस भरतीच्या बदलांविरोधात युवकांमध्ये संताप

Subscribe

पोलीस भरती प्रक्रियेत अचानक केलेल्या बदलांच्या विरोधात गुरुवारी पुण्यात हजारो तरुण-तरुणींनी संताप व्यक्त केला. हा संताप नंतर भव्य मोर्चामध्ये रुपांतरित झाला. प्रशासनाच्या विरोधात पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. तसेच या ठिकाणी भरतीसाठी आलेले तरुण-तरुणी 11 फेब्रुवारीपर्यंत उपोषणाला बसणार असून नवे निकष रद्द करून जुन्याच पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी,अशी आंदोलकर्त्या तरूण- तरूणींची मागणी आहे.

पोलीस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशाप्रकारे 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणार्‍यांची पोलीस म्हणून भरती व्हायची. परंतु, आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून लेखीपरीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले आहेत. या बदलामुळे पोलीस दलाला शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार किती मिळतील याबाबत शंका असल्याचा आरोप करत आंदोलक विद्यार्थ्यांनी या दोन बदलांना पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणार्‍या हजारो तरुण-तरुणींनी विरोध केला आहे.

- Advertisement -

मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रात पोलिसांच्या फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. नवीन पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मोर्चा काढणे हा आमचा राजकीय पक्षाचा अजेंडा नाही, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना न्याय मिळणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित करून पोलीस भरतीचे पूर्वीचेच निकष कायम ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

परवानगी नाकारली

- Advertisement -

आंदोलन करणारे हे तरुण-तरुणी पुण्यातून मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र महामार्गावरुन धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता या तरुण-तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -