महाराष्ट्रातील राजकारणात क्वचितच मोठ्या कालावधीसाठी सुट्टी घेत असतात. राज्यातील नेते वैयक्तिक कारणामुळे, आरोग्याच्या कारणामुळे, शस्त्रक्रिया झाल्यावर विश्रांती घेण्यासाठी तसेच हवा बदलासाठी सुट्टी घेऊन परदेश वारी करत असतात. परंतू निवडणूक तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ३ महिन्यांची सुट्टी घेतली आहे. या ३ महिन्यांच्या कालावधीत ते कार्यरत राहणार नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोणत्या कारणामुळे सुट्टी घेतले हे कळले नसल्यामुळे राजकारणी वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत सुट्टी घेत असल्याचे सांगितले. आपण सुट्टीवर असलो तरी पक्षाची कामे सुरु राहती असे सांगत प्रभारी अध्यक्षांकडे पक्षाची सूत्रे दिली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की, पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून ३ महिन्यांसाठी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणांसाठी पक्ष हा चालला पाहिजे. संघटन हे चालले पाहिजे. आंदोलनाला सुरुवात केली आहे. ५ जिल्ह्यांमध्ये निवडणूका आहेत यामुळे पक्षाला अध्यक्ष असणं गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावरती प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. डॉ. अरुण सावंत, महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्ते यांना मदत करुन पक्ष यशस्विरित्याने विजयाकडे वाटचाल करुया आणि रेखाताई ठाकूर यांना सहयोग कराल अशी अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
निवडणूकांमधून अंग काढले?
राज्यात ५ जिल्ह्य परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक जोमाने काम करत असतो. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी ३ महिन्याची सुट्टी घेतली असल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणूकांमधून अंग काढून घेतले का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. आंबेडकर यांनी कोणत्या कारणामुळे सुट्टी घेतले हे स्पष्ट सांगितले नसून केवळ वैयक्तिक कारणासाठी सुट्टी घेतली असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांची प्रकृती उत्तम वाटत असल्यामुळे कोणत्या वैयक्तिक कारणामुळे सुट्टी घेतली याबाबत चर्चा सुरु आहे.