गेल्या दोन – तीन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, पायघर, रायगड सह कोकणातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवसही कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाच्या सरी बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. याबाबतचे ट्विट एएनआय वृत्त संस्थेने केले आहे.
आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस पडला असून यामुळे अंधेरी सबवेला पाणी साचले.
Fairly widespread to widespread rainfall very likely over Konkan & Goa, Central Maharashtra and Gujarat during next 5 days: India Meteorological Department pic.twitter.com/Iyx9GrVrel
— ANI (@ANI) July 15, 2020
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवसाकरता यलो तसेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणासाठी हा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्ग येथे आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. कोकणाचाच भाग असलेल्या मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि रत्नागिरी भागातही मोठ्या पावसाची शक्यता ही येत्या २४ तासांमध्ये हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवली आहे.