मुंबई : एखाद्या व्यक्तीचे कर्ज थकले किंवा कर्जाचा हफ्ता जरी थकला तरी त्या व्यक्तीला वेळेचे कोणतेही भान न ठेवता वसुली एजंट्सकडून फोन करण्यात येतात. अनेकदा तर कर्जदारांना बँकांच्या वसुली एजंट्सकडून मानसिक त्रास देखील देण्यात येतो. वसुली एजंट्सकडून होणाऱ्या त्रासामुळे काहींनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना घडल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे आता RBI ने बँकांना वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आता वसुली एंजट्सना कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (RBI directs banks to make code of conduct, restrictions on recovery agents)
हेही वाचा – Report: … म्हणून कमी वयातच मुलींना येतेय मासिक पाळी; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
कर्जदारांना वसुली एजंट्सकडून देण्यात येणारा त्रास पाहता RBI कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा सूचनामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार बँका आणि NBFC सारख्या नियमन केलेल्या संस्थांनी (RE) प्रमुख व्यवस्थापनाची कार्य आउटसोर्स करू नये. या कामांमध्ये पॉलिसी तयार करणे आणि KYC नियमांचे पालन करणे आणि कर्ज मंजूर करणे यांचा समावेश होतो. त्यामुळे याबाबत RBI ने सांगितले आहे की, RE ने हे सुनिश्चित केले पाहिजे की, ग्राहकांप्रती त्यांची जबाबदारी आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे कमी होणार नाही. मसुद्यानुसार, बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) डायरेक्ट सेलिंग एजंट (DSA), डायरेक्ट मार्केटिंग एजंट (DMA) आणि कलेक्शन एजंट्ससाठी आचारसंहिता तयार करावी.
त्यासोबतच, कर्जवसुली करणारे DSA, DMA आणि पुनर्प्राप्ती एजंट योग्यरित्या प्रशिक्षित आहेत की नाही, हे नियमन केलेल्या संस्थांनी वारंवार निश्चित केले पाहिजे. त्यामुळे कर्जाची वसुली करणार एजंट हे त्यांच्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि नीट पार पाडतील. तर, RE आणि त्यांचे वसुली एजंट कर्जाची वसुली करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत शाब्दिक किंवा शारीरिक, तसेच, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. यासह, वसुली एजंट कर्जदारांचा सार्वजनिकपणे अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशी माहिती मध्यवर्ती बँकेकडून देण्यात आलेली आहे.
RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल गुरुवारी (ता. 26 ऑक्टोबर) थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नव्या नियमांनुसार, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत. तसेच, बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच वसुली एजंट्सना कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय RBI कडून घेण्यात आलेला आहे.