गणेशोत्सवापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे किल्ले रायगड परिसरातील सावरट-संदोशी गावाकडे जाणारा रस्ता वाहून गेल्यामुळे या परिसरातील चार गावांचा संपर्क तुटला. या मार्गावर शासकीय मदतीची वाट न पाहता गणेशोत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांना गावात जाण्यासाठी तात्काळ मोफत वाहतूक सेवा दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोकणामध्ये गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, पुणे, ठाणे, तसेच गुजरात राज्यातील सुरत, बडोदे, अहमदाबाद या शहरांतून आपल्या मूळ गावी दाखल होत असतात. मात्र भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम असणार्या तालुक्यातील गावांमध्ये वाहतुकीच्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी स्वतः पुढाकार घेत वैयक्तिक आर्थिक भार उचलून गणेश भक्तांकरिता मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांदोशी, सावरट, बावळे, कावळे, करमर, खळई या गावांकडे जाणारा रस्ता वाहून गेला होता. त्यावेळी गोगावले यांनी ताबडतोब रस्ता करून दिला.
आमदार गोगावले यांचे गावातून कौतुक होत असताना अतीपावसामुळे एस.टी. बस सेवा सुरळीत होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी गणेश भक्तांसाठी वैयक्तिक आर्थिक जबाबदारी स्वीकारून दोन पिकअपची व्यवस्था करून दिली. १० दिवस ही सेवा मोफत होणार आहे. सांदोशी ते बांधणीचा माळ व सावरट ते बांधणीचा माळ अशी ही सेवा असणार आहे, अशी माहिती शिवसेनाप्रणित वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.