घरमहाराष्ट्रशिवसेनेने आतापर्यंत २३५ वेळा सत्तेला लाथ मारली - राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेनेने आतापर्यंत २३५ वेळा सत्तेला लाथ मारली – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

शिवसेना केंद्रात आणि राज्यातील सत्तेत भागीदार असूनही भाजपसोबत त्यांचे अनेक मुद्द्यावर वाद झालेले आहेत. त्यानंतर अनेकवेळा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची वल्गना केली. मात्र या धमकीचा नेमका आकडा किती? तो आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितला आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टिप्पणी करताना ते म्हणाले की, “शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. शिवसेनेने तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे आणि मगच मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

सरकारचे ‘असत्याचेच प्रयोग’

सरकार गांधीजींचे नाव घेते. पण प्रत्यक्षात त्यांनी गांधीजींच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम केले असल्याचे विखे पाटील म्हणाले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची द्विसुत्री दिली. पण हे सरकार खरे कधी बोलत नाही आणि खोटे बोलण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. १०० गोबेल्स मेले असतील, तेव्हा भारतीय जनता पक्ष जन्माला आला असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधीजींचे नाव घेणारे हे सरकार सारे ‘असत्याचेच प्रयोग’ करते आहे. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. पण हे ‘जागते रहो’ म्हणण्याऐवजी ‘भागते रहो’ म्हणणारे चौकीदार आहे. म्हणूनच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहूल चोक्सी पळाले. आता नितीन संदेसरा नावाचा आणखी एक ‘महापुरूष’ ५ हजार ७०० कोटी रूपयांचा घोटाळा करून पळून गेला. पण पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाहीत. या सरकारकडे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.

भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही. एकनाथ खडसेंनी भाजपसाठी रक्त आटवले. पण जो भारतीय जनता पक्ष एकनाथ खडसेंचा होऊ शकला नाही, तो जळगाव जिल्ह्याचा काय होणार? असा सवाल करून स्व. मधुकरराव चौधरी यांच्या काळातील विकासाचे युग पुन्हा परत आणायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -