मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर महाविकासआघाडीला विरोधक पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे. विधिमंडळात मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. मराठवाड्याच्या पाण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. पण सध्याचे महाविकास आघाडी सरकार या योजनांना स्थगित देण्याचे काम करत आहे. आता या सरकारने मराठवाड्याच्या पूर्वीच्या पाण्याच्या योजनांना स्थगिती दिली वा त्या बंद केल्या तर विधीमंडळात या प्रश्नासाठी संघर्ष करण्यात येईल आणि वेळप्रसंगी पाण्याच्या प्रश्नाचा लढा रस्त्यावर उतरुन लढला जाईल, असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोध पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी दिला.
पंकजा मुंडे यांनी सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना दरेकर यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या सोबत भाजप पूर्ण ताकदीनीशी आहे. काही हितशत्रुंना वाटत होते की, पंकजाताईना एकटे पाडून राजकारण साधायचे आणि त्यांच्यामध्ये, भाजपामध्ये फूट पाडण्याचा डाव आखायचा. पण, त्या हितशत्रुंचा डाव असफल ठरला असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
…तर विधिमंडळात या प्रश्नासाठी आक्रमक होणार
पंकजा मुंडे या भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळे मुळातच त्यांचा डिएनए हा संघर्षाचा आहे आणि म्हणूनच मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात त्या उतरल्या आहेत. गेल्या ५ वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने ११ धरणे जोडणारा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणला आणि मराठवाडयाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने हरीभाऊ बागडे व बबनराव लोणीकर यांनी खऱ्या अर्थाने मराठवाडयाच्या पाण्यासाठी प्रयत्न केल्याचेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
सरकारच्या कार्यपध्दतीवर टीकेची झोड उठवताना दरेकर म्हणाले की, ” महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे स्थगिती सरकार आहे अशी भावना निर्माण झाली आहे. हे सरकार आल्यापासून त्यांनी विविध प्रकल्प योजनांना स्थगिती देण्याचे काम सुरु केले आहे. म्हणून मराठवाडयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना या सरकारकडून स्थगिती मिळेल अशी भीती मराठवाडयातील जनतेला वाटते, याच कारणासाठी पंकजा मुंडे यांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. त्याचप्रमाणे मराठवाडयातील प्रकल्पांना स्थगिती न देता हे प्रकल्प अधिक गतीने व्हावे यासाठी या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सरकारचे त्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्य विभागाप्रमाणे मराठवाडयातील अनुशेष भरुन काढण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी करतानाच गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने काय केले ? असा सवाल जे विरोधक करत आहे. त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, त्यांना सडेतोड उत्तर देऊ असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले. गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने मराठवाड्यासाठी जे प्रगतीचे पाऊल उचलले तसा प्रयत्न यापूर्वीच्या कोणत्याही सरकारकडून झाला नाही. यामध्ये पंकजा मुंडे यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. ग्रामविकासच्या माध्यमातून २५ / १५ या योजनामार्फत ग्रामीण भागातील विविध योजनांना त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला आणि ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले. पण, या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली अशी टिकाही दरेकर यांनी केली.