महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १३ हजारपेक्षा अधिक जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. ३० हजार पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. २०१७ च्या तुलनेत ०.३६ टक्क्यांनी अपघात कमी झाले आहेत. मात्र, मृत्यूचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले असून जखमींच्या संख्येत साडेतीन टक्क्यांनी घट झाली आहे.
याबाबतची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली. रस्ते सुरक्षा सप्ताह उद्धाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अपघाताचे प्रमाण पादचारी, सायकल, दुचाकीस्वार यांचे सर्वांत जास्त आहे. यांच्या अपघाताचे प्रमाण ६५ टक्के असून २५ ते ४५ वयोगटातील चालक अधिक अपघातग्रस्त होतात. राज्यात १३२४ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आहेत. ते काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मद्यपान करुन वाहने मोठ्या प्रमाणात चालविली जातात. तसेच मोबाईलवर बोलण्याने आणि अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे १३ हजार जणांचा परवाना गेल्या २ महिन्यात रद्द करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा वाहन कायदा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.