पालघर : पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे पालघरमध्ये साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली. 2020मध्ये पालघरमध्येच दोन साधूंसह तिघांची जमावाने संशयातून निर्घृण मारहाण करत हत्या केली होती. वाणगाव येथे रविवारी पुन्हा भिक्षा मागण्यासाठी आलेल्या दोन साधूंना गावकऱ्यांनी घेरले होते. मात्र पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पालघर जिल्ह्यात वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रनगर गावात रविवारी दोन साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्यावेळी गावात अफवा पसरली की, साधूच्या वेशात लहान मुले पळवणारी टोळी आली आहे. ही अफवा पसरताच लोकांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही साधूंना घेरले. मात्र पोलिसांनी याची खबर लागली आणि काही अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगून दोन्ही साधूंना सुखरूप बाहेर काढले.
#Palghar Police Rescue Two #Sadhus From Mob…
In #Maharashtra Palghar district, an incident like #Moblynching on sadhus was about to happen again,but the Palghar police reached the spot and saved the sadhus.@Dev_Fadnavis @mieknathshinde @Palghar_Police @DGPMaharashtra pic.twitter.com/dqzNOBwTG7
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) April 4, 2023
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून जनसंवाद मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत एका पोलिसाला एका गावाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना गावकऱ्यांशी संवाद वाढवण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर, पोलीस आणि ग्रामस्थांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. ज्याद्वारे त्यांच्यात संवाद कायम राहतो. याच्याच माध्यमातून रविवारी साधूंना ग्रामस्थांना घेरल्याची माहिती पोलिसांना वेळेत मिळू शकली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि लोकांना समजावत दोन्ही साधूंना वाचवले.
काय घडले होते 2020मध्ये?
लॉकडाऊन काळात, 16 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री सुरतकडे जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांना अटक केली, यातील 11 आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले तर 30 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.