मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. हल्लेखोर ज्या तयारीने आले होते, ते माझ्या जीविताला हानी पोहोचावी, अशा दृष्टीने प्लॅनिंग करून आले होते, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे. त्याचाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करताना पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा – एल्विश यादवची रेव्ह पार्टी नोएडात, पण राजकारण रंगले महाराष्ट्रात; एकनाथ शिंदेंवर काँग्रेसचा निशाणा
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी एका जमावाने आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला होता. त्यांच्या घरावर या जमावाने आधी दगडफेक तर नंतर घरासमोरील वाहने जाळून टाकली. वाहनांना लागलेली आग आता त्यांच्या बंगल्यापर्यंतही जाऊन पोहचली होती. या घटनेच्या दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन आमदार सोळंके यांनी त्या घटनेची माहिती दिली. जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. हे सर्व तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते, असा खळबळजनक दावा सोळंके यांच्याकडून करण्यात आला आहे.
जीवे मारण्याचा कट होता, पण वाचवले मराठ्यांनीच; आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा | #MyMahanagar @prakashsolnke https://t.co/ezV3EXx8lt
— My Mahanagar (@mymahanagar) November 2, 2023
याच संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत की, त्यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. आणि या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असेही त्यांचे म्हणणे असून हे गृह खाते आणि गृहमंत्री यांचे अपयश अधोरेखित करणारे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : तारखांच्या संभ्रमावर उदय सामंत थेटच बोलले; म्हणाले-
या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर, सर्वसामान्य जनतेचे काय? हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.