‘व्हॅलेंटाईन्स डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी प्रियकर – प्रियसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी या दिवसाची हमखास वाट पाहत असतात. मात्र, या जागतिक प्रेमदिनी अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना एक वेगळीच शपथ देण्यात आली. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ विद्यार्थिनींना देण्यात आली आहे.
का घेतली अशी शपथ?
सध्या प्रेम प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हुंडा घेण्याची पद्धतही वाढली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ना प्रेम करणार, ना प्रेम विवाह करणार’,अशी अनोखी शपथ घ्यायला लावली आहे.
काय घेतली शपथ?
‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली आहे.
अशी शपथ देणे विचित्र आहे
‘प्रेम करणार नाही आणि प्रेम विवाह करणार नाही’,अशी शपथ अमरावती येथील एका महाविद्यालयात देण्यात आली. मात्र, हे विचित्र आहे, अशी शपथ विद्यार्थ्यांकडून घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा – पुलवामा हल्ल्याबाबत जुन्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा युटर्न; झेंड्याबाबतही दिले स्पष्टीकरण