धुळे जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी म्हणून गावातील नागरिकांनी अनोळखी पाचजणांची दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्या होण्याअगोदर व्हाट्सअॅपवर मुले पळवणारी टोळी फिरत असल्याचे संदेश प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आले होते. याच संशयावरून निरपराध पाचजणांची हत्या गावकर्याकडून झाली होती.त्यामुळे व्हाट्सअॅप हे किती प्रभावी आहे याची प्रचिती आली,याचाच सकारात्मक प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये आला आहे. शुक्रवारी इयत्ता ६ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी रस्ता भरकटले आणि तब्बल सहा तास आई-वडिलांपासून त्यांची ताटातूट झाली. मात्र व्हॉट्सअॅप वरून दोन मुले बेपत्ता असल्याचा संदेश वार्यासारखा प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहचला आणि सहा तासानंतर दोन्ही मुले सुखरूप आई-वडिलांना सापडली आहेत.
प्रज्वल चंदनशिवे आणि रविराज सुरवसे हे दोघे काळेवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत इयत्ता ६ वीत शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे दोघे मित्र हे शुक्रवारी सकाळी सात वाजता घरातून शाळेसाठी निघाले. दुपारी शाळा सुटल्यानंतर ते शहराच्या परिसरात फिरायला गेले. दोघे फिरत असताना रस्ता विसरले आणि भरकटले. त्यामुळे त्यांची पंचायत झाली. घरच्यांना मुले आली नसल्याने चिंता वाटू लागली. याची माहिती काही वेळातच सर्वांना मिळाली. शोध मोहीम सुरू झाली. तर्कवितर्क लावण्यात आले. घरातील व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर काळेवाडीतील दोन मुले बेपत्ता असल्याचा संदेश टाकला आणि पाहता पाहता तो हजारोंच्या मोबाईलवर व्हायरल झाला.
त्यानंतर एका व्यक्तीने त्या दोघांना पिंपरी गावठाण येथे पाहिले असल्याची माहिती प्रज्वल आणि रविराज यांच्या घर दिली. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. व्हाट्सअॅपमुळे त्यांचा शोध घेणे शक्य झाले. प्रज्वलची आई छाया चंदनशिवे यांनी सांगितले की, पिंपरी येथे दोन्ही मुले सुखरूप असून तुम्ही घेण्यासाठी या असा फोन आला होता. तातडीने तेथे जाऊन आपल्या मुलाला ताब्यात घेतले. चंदनशिवे हे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास आहे. ते मूळ तुळजापूर येथील आहेत. प्रज्वलचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. छाया चंदनशिवे यांना प्रज्वल व्यतिरिक्त एक मुलगी आहे. मात्र मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पायाखालची वाळू सरकली होती. मुलगा प्रज्वल मिळाल्यानंतर आईच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
सोशल मीडियाचा असाही उपयोग
सोशल मीडियाचा वापर आपण कशा प्रकारे करतो याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आलेला संदेश योग्य असल्याची खात्री करा आणि पुढे पाठवा जेणेकरून चांगल्या गोष्टीदेखील घडतील. ही दोन्ही मुले मिळण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.