‘बाल भिकारी मुक्त भारत’ करण्यासाठी चिरंजीवी संघटनेच्यावतीने आज मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे. अवघ्या १६ वर्षीय वयाची संघटनेची अध्यक्षा सलोनी तोडकरी हिने हे उपोषण छेडलं आहे. उपोषणस्थळी संविधान, पाटी, खेळणी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.
तीन दिवस उपोषण सुरु राहणार
चिरंजीवी संघटनेच्या वतीने ‘बाल भिकारी मुक्ती’साठी दिनांक २४, २५ आणि २६ डिसेंबर असे तीन दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. मैत्रकुल जीवन विकास केंद्र, शांतीभवन, देवरुंग पाडा, बापगाव कल्याण येथे उपोषण सुरु करण्यात आलं आहे. साने गुरुजी जयंती निमित्ताने सानेगुरुजींच्या गोष्टींचे अभिवाचन करून उपोषणाची सुरूवात करण्यात आली. भारतातून बालभिकारी नष्ट करणं, त्यांचे पुनर्वसन करणं ही सरकारची जबाबदारी आहे. देशात व राज्यात बालभिकारी यांचे प्रमाण वाढत चालले आहे. चिमुरडी मुले रस्त्यावर, सिग्नलवर भीक मागताना आढळत आहेत. त्यांचे भविष्य संपुष्टात येत आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘बालभिकारी मुक्ती’साठी हे उपोषण करण्यात येत असल्याचं तोडकरी हिने सांगितले. यावेळी मंजिरी धुरी, वैष्णवी ताम्हणकर, चेतन कांबळे, राहूल भाट आदी उपस्थित होते.