मुंबईतील कुर्ला पश्चिम बेलग्रामी रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने वडिलांना फोन करून “मी आता परत येणार नाही” असे कळवले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
वयवर्ष ३१ असणाऱ्या पुरुषोत्तम गोरे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव होते. एका खाजगी वाहनावर चालकाचे काम करणारा पुरुषोत्तम याचा चार वर्षांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर पत्नीसोबत बेलग्रामी रोड, अंजुमन इस्लाम शाळेजवळील चाळीत राहणाऱ्या पुरुषोत्तमची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली होती. पत्नीच्या नोकरीवर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा सुरू होता.
असा घडला प्रकार
शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पत्नी कामावर गेल्यानंतर पुरुषोत्तम हा घरात एकटाच होता. त्याने रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास कुर्ल्यातच राहणाऱ्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून “मी आता परत येणार नाही” एवढे बोलून फोन ठेवून दिला. मुलाने एवढ्या रात्री फोन करून असा का बोलला म्हणून वडील चिंतेत होते. त्यांनी मुलगा पुरुषोत्तमला परत फोन केला, मात्र तो फोन उचलला नाही, फोन उचलत नसल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून पुरुषोत्तम फोन उचलत नसल्याचे सांगितले.
शेजाऱ्यांनी पुरुषोत्तमचे दार ठोठावले, मात्र आतून कुठलीच हालचाल होत नसल्याचे शेजाऱ्यांनी त्याच्या वडिलांना सांगितले. रात्री ३ च्या सुमारास वडील आणि भाऊ दोघे घरी आले व त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. मात्र पुरुषोत्तम हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. घटनास्थळी दाखल झालेल्या कुर्ला पोलिसांनी पुरुषोत्तमच्या गळ्याचा फास काढून त्याला भाभा रुग्णालय येथे दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे वपोनि दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.