भाजपच्या मुंबई सचिव दिव्या ढोले यांना भाजपचाच कार्यकर्ता असगर शेख यांच्या मोबाईलवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे धारावी मंडल अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलीस ठाण्यात काल शनिवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. “भाजप पक्षात जर एखाद्या महिलेचा आदर होत नसेल, महिलांना चुकीची वागणूक दिली जात असेल, महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पक्ष पाठीशी घालत असेल, तर सर्वसामान्य महिलांना कसे संरक्षण देणार? असा सवाल दिव्या ढोले यांनी केला आहे.
धारावीतील या प्रकरणामुळे पक्षातील या अंतर्गत वादामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संतापजनक घटनेची भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार याच्यांकडे लेखी आणि तोंडी तक्रार केली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते माझ्या तक्रारीची नक्कीच दखल घेतील, अशी माहिती दिव्या ढोले यांनी आपलं महानगरला दिली. “पोलिसात गुन्हा नोंद करण्या अगोदर वरिष्ठ नेत्यांना पत्रव्यवहार करून आणि प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती दिली आहे. शेवटी हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, असे दिव्या ढोले यांनी सांगितले आहे.
भाजपच्या मुंबई सचिव दिव्या ढोले यांना धारावी तालुक्याध्यक्ष मनी बालन यांच्याकडून शिवीगाळ. महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोप. पोलिसात तक्रार दाखल. @DholayDivya @ShelarAshish @BJPforMumbai @MumbaiBJP @TawdeVinod #BJP #betibachao pic.twitter.com/ortQOw0X54
— My Mahanagar (@mymahanagar) October 7, 2018
धारावीत गेले पाच वर्षे महिला पदाधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही. आमच्या सारख्या महिला पक्ष वाढवण्याचे काम करतात. तरिही जर न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचे? माझ्यासोबत असलेल्या महिलांच्या आग्रहाखातर आणि माझ्यावर विनाकारण झालेल्या अन्याय, बदनामी विरुद्ध मी रितसर धारावी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असल्याचे ढोले यांनी सांगितले.
भाजपचे धारावी तालुका अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलीस ठाण्यात घाणेरडे वक्तव्य, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेची बदनामी, मानहानी आणि महिलेस लज्जा येईल, असे वक्तव्य केल्याबद्दल कलम ५०० व ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या गुन्ह्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार आणि अशा पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार? असा प्रश्न धारावीतील भाजप मधील महिला पदाधिकारी आणि धारावीतील समस्त नागरिक विचारत आहेत.
उमेदवारी दिली नाही म्हणून माझ्याविरुद्ध तक्रार – मनी बालन
दिव्या ढोले यांना भाजपने २०१४ साली उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. महापालिका निवडणुकीत बाहेरील उमेदवारामुळे पक्षाला फटका बसला होता. यावेळी २०१९ साठी स्थानिक उमेदवार द्यावा, अशी आम्ही मागणी केली होती. त्यामुळे त्यांना राग आला आणि यातूनच हा प्रकार घडल्याचे मनी बालन यांनी आपलं महानगरला स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.
याअगोदरही असेच प्रकरण घडले
या अगोदर मैथिली जावकर यांनी २०१६ मध्ये भाजपचे मुंबई युवामोर्चा अध्यक्ष गणेश पांडे याच्यावर असभ्य वर्तन केल्याची तक्रारी दाखल केली होती. नंतर गणेश पांडेला भाजपने पक्षातून बडतर्फ केले होते. महिला आयोगानेही नोटीस बजावली होती. आता भाजपचे धारावी तालुका अध्यक्ष मनी बालन यांच्यावर कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.