अलिबाग, ता २४ : मंगळवारी रात्रीपासून रायगडला पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.
मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास विश्रांती घेतली. त्यानंतर धुंवाधार बरसायला सुरूवात झाली. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. शहरी भागात रस्त्यावर फुटभर पाणी होते. त्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
आजच्या पावसाने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे . पेण ते वडखळ या 6 किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल दोन ते अडीच तास जात होते . अंबा , कुंडलिका नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत . गेले 8 दिवस पाऊस नसल्याने शेतातील पाणी कमी झाले होते . परंतु आता जोरदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या शेतीच्या कामाना पुन्हा वेग आला आहे.