उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे. सनम करोटिया असे त्या महिलेचे नाव आहे. हत्या करून हल्लेखोर पळून गेले होते. मात्र अवघ्या तासाभरातच पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एक असलेल्या बाबू धकनी याला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. मारेकरी हे उल्हासनगरमधील असून मृत तरुणीच्या परिचयाचे होते. मात्र हा हल्ला नेमका का झाला? याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कल्याणचे महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – स्वयंपाकाच्या कारणावरुन विवाहितेची आत्महत्या
भर गर्दीत तरुणीवर चाकूने वार
सनम करोटिया ही महिला संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या अॅक्टिवा गाडीने कल्याण एपीएमसी मार्केटच्या आवारात आली होती. त्या ठिकाणी अगोदरपासून दोन तरूण तिची वाट पाहत उभे होते. ती आल्यानंतर त्या तरूणांनी तिच्याशी संभाषण केले. आणि त्यानंतर लगेच धारदार शस्त्राने तिच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले. सनम रक्ताच्या थोराळयात खाली पडल्यानंतर दोघे हल्लेखोर तेथून पळून गेले. एमपीएमसी मार्केटमधील हमालांनी सनमला नजीकच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त विवेक पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अवघ्या तासाभरातच एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले.