किडनी स्टोन हा एक सामान्य आजार असून किडनी स्टोनमुळे आपल्या शरीरातील कोणत्याही अवयवावर परिणाम होणार नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो एक मोठा गैरसमज आहे. नवी मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याच्या आजाराने चार नागरिकांवर त्यांची किडनी गमावण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय सारिका कर्णीक (बदललेले नाव) यांना पोटामध्ये दुखण्याच्या तक्रारीवरून तेरणा हॉस्पिटलमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भरती करण्यात आले होते, सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर तिला पायोनिफ्रोसिस (मूत्रपिंडामध्ये पस आढळणे) असल्याचे आढळून आले. सारिका हिला गेली वर्षभर मुतखड्याचा त्रास होता आणि तिच्या पोटातही वारंवार दुखत होते पण, तिने कोणतीही वैद्यकीय चाचणी न करता फक्त पेन किलर गोळ्या खाल्ल्या. पेन किलरमुळे तिच्या पोटाचा त्रास कमी झाला पण, शरीरातील मुतखडा हा तसाच राहिल्यामुळे तिच्या मूत्रपिंडात जंतुसंसर्ग वाढीस लागला. त्यामुळे तिच्यावर तात्काळ शल्यचकित्सा करून तिच्या उजव्या बाजूची किडनी काढावी लागली. तसेच लघवी मूत्राशयात वाहून नेणारी युरेटरसुद्धा म्हणजेच मूत्रवाहिनी काढण्यात आली. चार दिवसांपूर्वी तिला घरी सोडण्यात आले असून आता तिची प्रकृती उत्तम आहे.
याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे मूत्रविकारतज्ज डॉ. निशांत काठाळे यांनी “मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन हा सर्वसामान्य आजार असून जर या आजारावर योग्य वेळी योग्य ते उपचार केले नाहीत तर जंतुसंसर्ग वाढून किडनी गमावण्याची वेळ रुग्णावर येते. गेल्या पंधरा दिवसांत अशा चार नागरिकांवर त्यांची एक किडनी गमावण्याची वेळ आली आहे. किडनी स्टोन झाल्यावर तो नक्की कोठे आहे त्याचा आकार तसेच तो कोणत्या प्रकारात येतो यासाठी वैद्यकीय तपासण्या फार गरजेच्या असतात आणि या तपासण्या अनेक रुग्ण करत नाहीत. याउलट पेनकिलर औषधे घेऊन आपला मुतखडा आपोआप पडून जाईल या भ्रामक कल्पनेत राहतात.”
कसा होतो मुतखडा ?
मूत्रपिंडाच्या पेशींना नेफ्रॉन म्हणतात. जन्मानंतर कोणतेही नवीन नेफ्रॉन तयार केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मुतखड्यामुळे होणाऱ्या मूत्रपिंडाच्या पेशींचा ऱ्हास हा कायमस्वरूपी असतो आणि त्यामुळे मूत्रपिंड खराब अथवा उद्धवस्त होत जाते. याची जाणीव त्या रुग्णाला होत नाही कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तो पेनकिलर गोळ्या घेत असतो व हेच कारण मूत्रपिंड म्हणजेच किडनी गमवण्यासाठी कारणीभूत ठरते.
हेही वाचा –
मतांची आकडेवारी – काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित एकत्र असते, तर भाजप संकटात होता!