घरमुंबईमुंबईत पावसाचा कहर; रेल्वे खोळंबली, घरघरांत साचले पाणी, शॉक लागून दोन बळी

मुंबईत पावसाचा कहर; रेल्वे खोळंबली, घरघरांत साचले पाणी, शॉक लागून दोन बळी

Subscribe

मुंबईत पावसाने थैमान घातले. या पावसामुळे लोकल सेवा खंडीत झाले. अनेकांच्या घराघरांत पाणी साचले. यासोबतच काही लोकांचा बळी देखील या पावसाने घेतला.

पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांना खिंडीत गाठून शनिवारपाठोपाठ रविवारीही घरी बसवले. शनिवारी दुपारपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे लोकल खोळंबली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे घराचा मार्ग उशिराने सापडला. परंतु, रविवारीही पावसाचा जोर कायमच राहिला आणि पुन्हा एकदा रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसला नसला तरी अनेक भागांमध्ये घराघरांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे लोकांची जीवाच्या आकांताने एकच पळापळ सुरु होती. दरम्यान सांताक्रुझ येथे शाॅक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

सकाळपासून पाणी साचायला सुरुवात

शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर आणि उपनगरामध्ये दीडशे ते दोनशे मि.मी एवढा पाऊस पडला होता. परंतु सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत शहरात ६ मि.मी आणि उपनगरांत १२ मि.मी एवढा पाऊस पडला. त्यामुळे दिवसभरात मुंबईत पाऊस नसला तरी विरार, नालासोपारा, कल्याण, कर्जत आदी भागांमधील मुसळधार पावसामुळे तसेच तुंबलेल्या पाण्यामुळे रेल्वे लोकल सेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु असली तरी नायगाव-वसईमध्ये रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली. तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच बंद होती. रविवारी सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम होता. शहरातील शीव, तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, सांताक्रुझ, गोरेगाव तसेच पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, चेंबुर, मुलुंड आदी भागांमधून पाणी साचले होते होते. वांद्रे खेरवाडी आणि पूर्व उपनगरांतील एल. बी. एस रोडवर पाणी तुंबले होते.

- Advertisement -

४०० कुटुंबांचे स्थलांतर 

मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सुमारे ४०० कुटुबांचे स्थलांतर बैलबाजार येथील महापालिका शाळेमध्ये करण्यात आले होते. त्यासर्वांना महापालिकेच्यावतीने चहापाणी नाश्तासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मिठी नदीची पाहणी करून नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीचा आढावा घेतला. सकाळी पावणे आठच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथील नुरानी मस्जिदजवळ दिडोशी येथे दरडीचा भाग काही रिकाम्या घरांवर कोसळला. येथील काही घरे आधीच रिकामी करण्यात आली. परंतु, याठिकाणी असलेल्या चार लोकांना किरकोळ मार लागला. यापूर्वी ५० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. रविवारी पुन्हा आणखी ५० लोकांचे स्थलांतर करण्यात आले.

धारावीत एक तरुण बेपत्ता

धारावी येथे दुपारी साडेअकराच्या सुमारास धारावी बस डेपोच्यासमोरील राजीव गांधी नगर येथे राजा मोहम्मद मजार शेख (२०) हा तरुण खाडी परिसरात प्रात:विधीसाठी गेला होता. परंतु तो परत न आल्याने नागरिकांनी तो तरुण खाडीत पडल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार या तरुणाचा शोध संध्याकाळपर्यंत सुरु होता.

- Advertisement -

विजेच्या शॉकने आई-मुलाचा मृत्यू

सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार नगर येथील राजे संभाजी विद्यालयाजवळील सहयोग सहजीवन प्रगती मंडळाच्या भागात घरात पाण्यामुळे विजेचा शाॅक लागल्यामुळे ५२ वर्षीय माला भुमन्ना नागम आणि २६ वर्षीय संकेत भुमन्ना नागम हे जबर जखमी झाले हेाते.त्यांना जवळील व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.

भरतीमुळे किनाऱ्यावर साचला २०० मेट्रिक टन कचरा 

सकाळी समुद्राला मोठी भरती असल्याने या उधाणाच्या भरतीमुळे समुद्र लाटांबरोबरच आतील कचरा बाहेर फेकला जात होता. त्यामुळे दुपारी महापालिकेने विशेष कामगारांच्या मदतीने ही सफाई केली. जुहू चौपाटीवरुन ११५ मेट्रीक टन , तर वर्सोवा चौपाटीवरून ९७ मेट्रीक टन आणि दादर-माहिम चौपाटीवरून ३० मेट्रीक टन कचरा साफ करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -