रात्रीच्या वेळी मेट्रोच्या कामाला परवानगी
मुंबई | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेले काम रात्रीच्या वेळीही सुरू ठेवण्यासाठी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कामाला आता आणखी वेग येणार आहे.
तत्पूर्वी एमएमआरसीच्या वतीने युक्तीवाद करताना जमिनीखाली भुयारीकरणासाठी टनेलिंगचे काम सातत्याने करावे लागते, त्यासोबतच टनेलिंगच्या कामाअंतर्गत तयार होणारा राडारोडा तसेच त्याची वाहतूकदेखील रात्रीच्यावेळी करण्यात येते. म्हणूनच रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम करणे योग्य असल्याचे सांगण्यात आले.
हायकोर्टाच्या आदेशानुसार आता मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गतचे काम रात्री 10 ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादांचे उल्लंघन झाले तर ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा तयार करा, असेही न्यायालयाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याआधी नागरिकांच्या ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारीवरून कफ परेड भागातील मेट्रो 3 प्रकल्पाचे काम डिसेंबर महिन्यापासून थांबवण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळामार्फत गेल्या महिन्यात सध्या मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नीरी या संस्थेला देण्यात आली होती. नीरीने ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे आकडे त्यांच्या अहवालात मांडले. अहवालातील सुचनेनुसार मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी पुरेशा उंचीवर नॉईज बॅरिअर उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. जास्त आवाज करणार्या मशीनचा वापर हा दिवसाच्या वेळेतच करावा, असेही नीरीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प हा कफ परेडच्या बिझनेस हबची कनेक्टीव्हीटी मुंबई उपनगरातील सीप्झसोबत करणार आहे. शहर आणि उपनगराला तत्काळ कनेक्टिव्हीटी मिळतानाच वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे.
क्रिस्टलवासींना ‘वर्षा’मध्ये ठेवा!
मुंबई । क्रिस्टल टॉवर ही इमारत राहण्यास योग्य नसल्याचे महानगर पालिकेचे म्हणणे असेल तर ’वर्षा’ किंवा ’मातोश्री’वर आश्रय घेण्याचा इशारा तेथील रहिवाशांनी दिला आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई खर्च करून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतो. मात्र, त्यानंतरही केवळ भ्रष्टाचारामुळे त्यांना बेघर व्हावे लागत असेल, तर हा त्यांच्यावरील मोठा अन्याय आहे. त्यामुळे आपल्यावरील अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी हे रहिवासी ’वर्षा’ किंवा ’मातोश्री’वर आसरा घेणार असतील तर त्यात गैर तरी काय? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला.
तरुणांमध्ये आत्महत्येच्या विचारात वाढ
मुंबई । पोद्दार इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनने मुंबईतील 750, बंगळुरुतील 500 आणि चेन्नईतील 650 तरुण-तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये 14 ते 25 या वयोगटातील तरुण-तरुणांचा समावेश होता. रेल्वे स्थानक, कॉफी शॉप्स आणि मॉल येथे काम करणारी किंवा तिथे सर्वेक्षणावेळी उपस्थित असणारी ही तरुण मंडळी होती. मुंबईतील 750 तरुण-तरुणांपैकी 64 टक्के जणांनी डिप्रेशनच्या काळात आत्महत्या करण्याचा विचार केला होता, तर त्यातून जे वाचले होते, ते पुन्हा प्रयत्न करण्याच्या विचारात होते, अशी धक्कादायक आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली. डिप्रेशनमध्ये असताना तुम्ही काय करता, असे मुंबईतील तरुण-तरुणींना विचारले असता, त्यातील 38 टक्के जणांनी ड्रग्जचा पर्याय निवडतात, 17 टक्के जण धुम्रपान करतात, असे सांगितले.
राष्ट्रवादींच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आणखी एक यादी आणि दोन जिल्हाध्यक्ष आणि एका कार्याध्यक्षाची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली. पक्षाची सन 2018-2020 पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक होवून यापूर्वी 50 जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून शुक्रवारी जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदाची चौथी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मालेगाव जिल्हाध्यक्ष-मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, गडचिरोली- जिल्हाध्यक्ष- रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष- प्रकाश ताकसांडे आदींचा सामवेश आहे.