मतदान हा एकमेव चान्स आहे. जो पाच वर्षांनी आपल्याला मिळत असतो. आपले मत आपली जीवनशैली बदलू शकते एवढी ताकद या मतात आहे. त्यामुळे मत द्यायलाच हवे असे मी आवर्जून सांगेन. प्रेक्षकांना मी अभिनेता म्हणून जसा माहीत आहे, तसा निसर्गप्रेमी भ्रमंती करणारा टूरिस्ट आहे ही माहीत आहे. या निमित्ताने मी भारतभर प्रवास केलेला आहे. आजवर या संदर्भातील बारा पुस्तके मी लिहिलेली आहेत. त्यांचे अनुवादही झालेले आहेत. परदेशातील वाचकांनी या पुस्तकांचे भरभरुन स्वागत केलेले आहे. भारतातील गड, किल्ले, अभयारण्ये, तलाव या विषयीची माहिती दिलेली आहे. काही ठराविक ठिकाणे सोडली तर शासनाचे फारसे लक्ष त्या ठिकाणी गेलेले नाही असे दिसते. एकूण तीनशे पन्नास किल्ले आहेत. वेळीच त्या किल्ल्यांकडे लक्ष दिले नाही तर इतिहासाची साक्ष उरणार नाही. शासनाचा मी वर्डवाईल्ड अॅम्बेसेडर आहे. टेकड्या, डोंगर यांचा फायदा घेऊन मोठा उद्योग इथे निर्माण करता येऊ शकतो. किल्ल्यांच्या सौंदर्याला जराही धक्का न लावता हिल-स्टेशन पर्यटकांच्या राहण्याची ठिकाणे व्हायला हवी. सत्तर टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत. त्यातूनही पर्यटक फक्त अजंठा-वेरुळ पहाणेच पसंत करतात. याचा शासनाने शोध घ्यायला हवा. परदेशी पर्यटक राजस्थान, केरळ, गोवा इथे जाणे पसंत करतात. किल्ल्यांच्या निमित्ताने सरकारने हा पर्यटक महाराष्ट्रात कसा येईल हे पहाणे गरजेचे आहे.
मिलींद गुणाजी अभिनेता