मागील अनेक वर्षांपासून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आसिफ कराडिया असे या पाकिस्तानी नागरिकाचे नाव आहे. आसिफ मागील ५० वर्ष भारतात वास्तव्य करत आहेत, त्यामुळे त्यांना येत्या १० दिवसात नागरिकत्व द्यावे असे सांगण्यात आले. न्यायमूर्ती ए एस ओका आणि एम एस सँक्लेचा यांनी हे आदेश दिले आहे. आसिफचे आई-वडिल हे भारतीय असल्याने त्याला भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. आसिफ यांनी डिसेंबर २०१६ मध्ये नागरिकत्वाच्या प्रश्नावरून उच्चन्यायालयात धाव घेतली होती.
काय आहे प्रकरण
आसिफ हे मुळ पाकिस्तान नागरिक आहे. त्यांना भारताकडून दीर्घकाळासाठी व्हिसा देण्यात आला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांचा व्हिसा वाढवण्यास अधिकाऱ्यानी नकार दिला होता. जोपर्यंत आसिफ पाकिस्तानी व्हिसा सादर करत नाही तोपर्यंत व्हिसा मुदत वाढवणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यानंतर आसिफ यांनी न्यायालयात धाव घेतली. भारतात मागील ५० वर्षे राहिल्याने आता भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता. आसिफ यांंचा जन्म हा कराचीचा आहे मात्र त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांमध्ये त्यांच्या आईने त्यांना भारतात आणले. त्यांच्या आई-वडिलांचा जन्म गुजरात येथे झाला होता त्यामुळे त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली जात होती. अखेर न्यायालयाने त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तयारी दाखवली आहे.