पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. हे वेळापत्रक गुरुवार म्हणजे आजपासून लागू झाले आहे. या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी भाईंदर-चर्चगेट महिला विशेष लोकल आता विरार स्थानकावरुन ८ वाजून ४४ मिनिटांनी सुटणार आहे. त्याचबरोबर वसई रोड येथून ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी गाडी विरार येथून ९ वाजून ४७ मिनिटांनी सुटणार आहे. दरम्यान, या वेळापत्रकावर प्रवासी संघटना नाराज झाल्या आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने नविन वेळापत्रक ठरवताना प्रवासी संघटनांना विश्वासात घेणे जरुरीचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वेळापत्रकामध्ये काय आहेत बदल?
या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर १० गाड्यांच्या नविन फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. शिवाय, २६ लोकल गाड्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने एसी गाड्यांच्याही थांब्यात वाढ केली आहे. आता नविन वेळापत्रकानुसार एसी लोकल या मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅंड रोड, दहिसर, मीरारोड, नायगाव, नालासोपारा या स्थानकांवर थांबणार आहेत.
प्रवाश्यांमध्ये नाराजीचे सूर
या नविन वेळापत्रकावर प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी संघटनांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे भाईंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष गाड्यांचा विस्तार न करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने ही विनंती धुडकावत गाड्यांचा विस्तार विरारपर्यंत केला आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे.
हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर लवकरच १३० एटीव्हीएम मशीन