कामाठीपुराचा परिसर हा एकूण ३९ एकर जागेवर वसलेला आहे. जवळपास ८ हजार कुटुंबे याठिकाणी राहत असून येत्या दोन महिन्यात कमाठीपुराच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी विधानसभेत दिले. त्याचबरोबर मुंबईतील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्वसनाबाबत महिन्याभरात संयुक्त बैठक लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील अंधेरी पीएमजीपी प्रकल्पाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी कमाठीपुरा पुनर्विकासाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी बोलताना आव्हाड यांनी कमाठीपुराच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेली ११ वर्षे रखडलेल्या अंधेरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्वसनाबाबत येत्या महिन्याभरात लोकप्रतिनिधी, म्हाडा तसेच रहिवाशी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर मुखमंत्र्यांच्या सहकार्याने यातून मार्ग काढण्यात येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.