घरमुंबईशिवसेनेचे आमदार तुकाराम  कातेंवर जीवघेणा हल्ला

शिवसेनेचे आमदार तुकाराम  कातेंवर जीवघेणा हल्ला

Subscribe

महाराष्ट्राचा झाला बिहार 

नागपूर आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना मुंबई नगरीतही जीवघेण्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. थेट आमदारावर हल्ला करण्यापर्यंत हल्लेखोरांची मजल गेली असून, महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. अणुशक्ती नगर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे मोटारीतून आलेल्या काही अनोळखी हल्लेखोरानी तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात काते थोडक्यात बचावले असून त्यांचा अंगरक्षक आणि कार्यकर्ता असे दोघे जण जखमी झाले आहेत.
हा हल्ला मेट्रो तीन प्रकल्पाच्या वादातून झाला असल्याचा संशय आमदार तुकाराम काते यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ६) शहाजी उमाप यांनी सांगितले.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरजवळ मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडचे काम सहा महिन्यापासून सुरु आहे. या प्रकल्पात नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, तसेच या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे. या मागण्यांसाठी शिवसेनेनेचे खासदार राहुल शेवाळे व आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी माती आणि डेब्रिज घेऊन येणारे डंपर महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्गाने ये-जा करतात. त्यातून माती आणि डेब्रिज रस्त्यावर सांडते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. डंपरमुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे डंपर जकात नाक्याकडील पर्यायी मार्गाने काढावे,अशी मागणी करण्यात आली होती. तरिही वाहतूक त्याच मार्गाने होत असल्यामुळे माती आणि डे ब्रिजची वाहतूक करणारे पाच डंपर काते यांनी ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आमदार तुकाराम काते हे आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नगर या ठिकाणी नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपात बसले होते. त्यावेळी दोन वाहनातून आलेल्या पाच जणांच्या टोळीने तलवारीने काते यांच्यावर हल्ला केला. मात्र काते यांचे अंगरक्षक यशवंत दुर्गुडे आणि कार्यकर्ते किरण सावंत हे हल्लेखोरांना रोखण्यासाठी पुढे आले असता त्यांच्यात झटापट झाली त्यात अंगरक्षक दुर्गुडे आणि सावंत हे जखमी झाले. हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात काते यांनी तीन ठेकेदारांची नावे दिले असून त्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असल्याची तक्रार काते यांनी केली.
शिवसेनेचे आमदार तुकाराम काते हे हल्ल्याच्या ज्या रात्री देवीचे दर्शन आणि एका कार्यकर्यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते त्या रात्री त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते आणि अंगरक्षक होते. एवढ्या गराड्यात देखील त्यांच्यावर हल्ला होऊन एकही हल्लेखोर कार्यकर्यांच्या हाती कसा नाही लागला, असा  प्रश्न निर्माण झाला असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

 या बाबत आमदार तुकाराम काते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ठेकेदारीच्या वादातून कातेंवर हल्ला – नवाब मलिक

ठेकेदारीच्या वादातून आमदार कातेंवर हल्ला झाला असून, याला शिवसेनेतील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. गृहखाते मुख्यमंत्र्यांच्या हातात असतानाही मुंबईत गँगवार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -