घरमुंबईसमाजसुधारक राजारामशास्त्री भागवत

समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत

Subscribe

राजारामशास्त्री भागवत हे प्रख्यात विद्वान आणि समाजसुधारक होते. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहाससंशोधन, धर्मसुधारणा, वेद-पुराणे, स्मृती वगैरेंची चिकित्सा इ. ज्ञानाच्या क्षेत्रांमधील मोठे प्रज्ञावंत होते. यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1851 रोजी कशेळी (ता. राजापूर जि. रत्नागिरी) येथील भिक्षुकी करणार्‍या कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. १८३० च्या सुमारास इंग्रजी शिक्षणार्थ त्यांचे वडील रामकृष्ण हरी व चुलते भास्कर हरी हे दोघे मुंबईस आले. पुढे रामकृष्ण हरी यांनी मुंबई नगरपालिकेत नोकरी केली. राजारामशास्त्री यांची आई ते लहान असतानाच वारली. वडील वेदान्त विषयाचे भोक्ते होते. सर्वसामान्यांना वेदान्त समजावा म्हणून रामकृष्णपंतांनी सायुज्यसदन (१८६८) आणि कायाजीचा संवाद अशी नाटके लिहिली होती. राजारामशास्त्री १८६७ साली मॅट्रिक झाले.

वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे ग्रँट मेडिकल कॉलेजात तीन वर्षे शिक्षण झाले. नंतर वडिलांच्या मृत्यूमुळे हे शिक्षण थांबले. एका संस्कृत पंडिताकडे अध्ययन करुन ते शास्त्री झाले. नंतर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये १८७५ साली ते शिक्षक झाले. नंतर ते सेंट झेव्हिअर कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत होते. १९०२ साली मुंबई विद्यापीठात ‘विल्सनफायलॉलॉजिकल’लेक्चरर म्हणून त्यांची निवड झाली. शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ साली बाँबे हायस्कूल व पुढे स्वालंबनाने मराठा हायस्कूल काढले. महर्षी कर्वे, रँ. परांजपे, बॅ, जयकर वगैरे अनेक नामवंत त्यांचे विद्यार्थी होते. भागवत लोकशिक्षक होते. पाश्चात्त्य व पौर्वात्य विविध भाषांचा सखोल अभ्यास शक्य व्हावा म्हणून लॅटिन, ग्रीक, अरबी, फार्सी वगैरे भाषा ते शिकले.

- Advertisement -

मुंबईमधील सर्वदेशीय वातावरणाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. विधवाविवाह वगैरे प्रश्नांवर सुरुवातीस त्यांची मते जुनी होती. नंतर मात्र ती पालटली. अस्पृश्यता निवारणाकडेही त्यांनी सक्रिय लक्ष दिले. हिंदू धर्माची शास्त्रबोवांनी जी निस्पृह व निर्भीड समीक्षा केली होती तिच्यासंबंधी डॉ. आंबेडकरांनीही त्यांची प्रशंसा केलेली आहे. १९०० नंतर प्रथम बडोदे व पुढे कोल्हापूर येथे वेदोक्त प्रकरण गाजले. मराठे क्षत्रिय आहेत असे शास्त्राधारयुक्त मत व्यक्त करून राजारामशास्त्री यांनी शाहू महाराजांचा पक्ष घेतला. मराठा मुलांची उपनयने चालू व्हावीत म्हणून कोल्हापूर-बेळगाव येथे जाऊन स्वतः त्यांनी पौरोहित्य केले. त्यांना गायत्री मंत्र दिला.

दीनबंधु ह्या सत्यशोधक मुखपत्रात जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अनेक वादळी लेख लिहिले. लोकहितवादींच्या धारदार शतपत्रांत त्यांनी भरच घातली. जोतीराव फुले व राजारामशास्त्री यांच्या काही प्रतिपादनात व कृतींत साम्य आढळते. स्त्रियांची सुधारणा व सुशिक्षण यासंबंधानेही शास्त्रीबोवांनी प्रयत्न केले. राजारामशास्त्री यांच्या पत्नी सुंदरबाई प्रेमळ व कष्टाळू होत्या. त्यांना एकुलती एक मुलगी होती ती १८९७ साली वारली. चुलत भावाला राजारामशास्त्र्यांनी पुत्रासमान मानले होते तोही १९०७ साली वारला. संस्कृतचे विद्वान असूनही त्यांना मराठी बोलभाषेचा विलक्षण अभिमान होता. मुंबई येथे ४ जानेवारी १९०८ रोजी राजारामशास्त्रींचे निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -