कोपरी पूल हा ठाणे पूर्व आणि पश्चिमला जोडणारा सर्वात जुना पूल असून, सध्या तो धोकादायक अवस्थेत असल्याने चर्चेचा विषय ठरतो आहे. दरम्यान कोपरी पुलाची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणीही केली जात आहे. याप्रकरणी
बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कोपरी पुलाचे बांधकाम लष्कराने करावे’ अशी मागणी केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केलेल्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी देखील अनुकूलता दर्शवली आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पूल दुर्घटनेनंतर, भारतीय लष्कराने तेथील पूल काही दिवसांतच उभा केला होता. त्यामुळे ‘आर्मीच्या कामाची क्षमता पाहता आर्मीचे जवान कोपरी पूल देखील योग्य पद्धतीने आणि कमी कालावधीत उभारू शकतील’, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिंदे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत, संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करू’, असे आश्वासन त्यांना दिले आहे .
वाचा : राम कदमांवर फौजदारी गुन्हा दाखल करा
गेल्या वर्षभरापासून अनेकवेळा रेल्वे, महापालिका आणि राज्य सरकारद्वारे कोपरी पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु होते. पण पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्याच्या कारणाने ही दुरुस्ती लांबली होती. मात्र, अलिकडची पुलाची धोकादायक स्थिती पाहता तिथे मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. यापूर्वीही कोपरी पुलाचा काही भाग कोसळला होता. ज्या घटनेमध्ये रेल्वेचा एक मोटरमन आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोपरी पूल हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भीती व्यक्त करत, तातडीने त्याची दुरुस्ती करण्याकडे पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
Video: मोदकाचा प्रसाद ATM मशिनमधून