गटार साफ करताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी गोवंडी परिसरात घडली. मृतांमध्ये विश्वजीत खगेंद्र देवनाथ, गोविंद संग्राम चोरिटिया आणि संतोष प्रभाकर कळसेकर या कामागारांचा समावेश असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनानासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
गोवंडीतील स्टेशन रोड, गणेशवाडी, मोरया इमारतीजवळील गटाराची साफसफाई करण्याचे काम एका खाजगी कंत्राटराराला कंत्राट देण्यात आले होते. गटार साफ करण्यासाठी सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता देवनाथ, चोरिटिया, कळसेकर हे तीन कामगार गटारात उतरले. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बराच वेळ होऊनही ते तिघेही बाहेर आले नाहीत. त्यामुळे ही माहिती गोवंडी पोलिसांसह मनपा अधिकारी तसेच अग्निशमन दलाला देण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गटारात उतरलेल्या तिन्ही कामगारांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हे तिन्ही कामगार कुर्ला आणि चेंबूरचे रहिवाशी आहेत. गटार साफ करताना गुदमरुन या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या घटनेत कोणी हलगर्जीपणा केला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान दुपारी एकाच वेळेस तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.