घरमुंबईवंचित बहुजन आघाडीचा सोमवारी पोलखोल मोर्चा

वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी पोलखोल मोर्चा

Subscribe

अंबरनाथ मधील नागरि सुविधांचा बोऱ्या उडाल्याने येथील स्थानिक प्रशासनाला त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

नागरी सुविधांअभावी अंबरनाथ शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याला नगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि आमदार व पालकमंत्री हे जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. येत्या सोमवारी ९ सप्टेंबर रोजी याबाबत जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरपालिकेवर ‘पोलखोल मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते धनंजय सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रुग्णालयात सुविधांची वानवा

आज सकाळी नगरपालिकेतील पत्रकार कक्षेत वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते धनंजय सुर्वे, सुधाकर बर्वे, संजय बन्सल, अविनाश गाडे, सतीश कांबळे एमआयएमचे शहराध्यक्ष अक्रम खान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी धनंजय सुर्वे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर आरोप केले. ते म्हणाले की, अंबरनाथ शहरातील गरीब जनतेच्या उपचारासाठी छाया रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असून देखील येथे प्राथमिक उपचार देखील होत नाहीत. ऑपरेशन थिएटर बंद असून एक्सरे मशीनसुद्धा बंद आहेत. डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे उपचारासाठी लोकांना ठाण्याच्या शिवाजी रुग्णालय अथवा मुंबईच्या रुग्णालयात जावे लागत आहे. मोठा गाजावाजा करून व लाखो रुपये खर्च करून छाया रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र बांधले आहे. त्याचे उद्धाटन झाले असले तरी ते अद्याप बंदच आहे. याला नगरपालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष, स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जागा वाटपात सन्मान राखला गेला नाही; एमआयएमचा वंचित आघाडीवर आरोप

शहरात कचऱ्याचे साम्राज्य

ते पुढे म्हणाले की, “याशिवाय शहरात असलेले एसटी स्टँड बंद असून त्याची अवस्था डम्पिंग ग्राउंड सारखी झाली आहे. या स्टँडच्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्या बसवल्या आहेत. मात्र तरी देखील पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पोस्ट ऑफिस कार्यालय आणि शिधावाटप कार्यालय मोडकळीस आले आहे. शहरातील गोरगरीब जनतेच्या लग्नसमारंभ, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात वेल्फेअर सेंटर सुरू केले होते. या इमारतीची आता पडझड झाली आहे. काही राजकीय नेत्यांचे स्वतःचे मंगल कार्यालय असल्याने ते जाणून-बुजून त्याची दुरुस्ती होऊ नये म्हणून नगरपालिकेवर दबाव टाकत आहेत. नगरपालिकेला स्वतःच्या मालकीच्या डम्पिंग ग्राउंडची जागा असून देखील अनधिकृत डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे.”

माहिती अधिकारात पोलखोल

कल्याण-कर्जत राज्यमहामार्गच्या कामात रस्त्याच्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसविले आणि नंतर ते काढून पुन्हा काँक्रीटीकरण केले जात आहे. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामाने शेकडो दुकानदार उद्ध्वस्त झाले. या राज्य महामार्गमध्ये अंबरनाथच्या हद्दीत आतापर्यंत १८५ लोकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. असे अनेक ज्वलंत समस्या सध्या शहराला भेडसावत आहेत. माहिती अधिकारामार्फत याबाबत माहिती मिळाली असून याची पोलखोल आम्ही मोर्चामध्ये सोमवारी करणार आहोत अशी माहिती धनंजय सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -