घरमुंबईशेतकरी आंदोलन बदनाम व्हावे ही तर सरकारची इच्छा - शिवसेना

शेतकरी आंदोलन बदनाम व्हावे ही तर सरकारची इच्छा – शिवसेना

Subscribe

शेतकऱ्यांनी भडकावे, हिंसाचार करावा व आंदोलन बदनाम व्हावे ही सरकारचीच इच्छा होती. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर ही सुप्त इच्छा पूर्ण करून घेतली असेल तर त्याने देशाची बदनामी झाली. शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला हे बोलणे सोपे आहे, पण कृषी कायदा रद्द करा असा आक्रोश साठ दिवसांपासून सुरू आहे. त्या कायद्याला इतके कुरवाळून का बसला आहात ? शेतकरी स्वतःची भाकर, भाजी स्वतःच दिल्लीच्या सीमेवर खात आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचा हाच स्वाभिमानी बाणा सरकारला अस्वस्थ करत आहे. पंजाबचे शेतकरी म्हणजे खलिस्तानी अतिरेकी, देशद्रोही आहेत, अशी दूषणे देऊन पंजाब त्यांना पुन्हा एकदा अशांत करायचा आहे, पण पंजाब अशांत झाला तर देशाला परवडणार नाही. राजेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना हातात काठी घ्यायचे आवाहन करताच ते गुन्हेगार ठरवले गेले. पण गोली मारो, खतम करो असे भडकावू भाषण देणारे संत मंडळ आज मोदींच्या मंत्रीमंडळात आहे अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे घडविण्यात आले, त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. सकाळी दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाली व दुपारी शेतकऱ्यांच्या परेडने संपूर्ण देश हादरून गेला. दिल्लीत अचानक गोंधळ व हलकल्लोळ माजला. कायदा आणि सुव्यवस्थेची अक्षरशः लक्तरे निघाली. प्रजासत्ताक दिनी असे काही घडावे याच्या वेदना सर्वांनाच आहे. आता आंदोलक शेतकऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे लोक तुटून पडले आहेत. दिल्लीत घुसून गोंधळ घालण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता व शेतकऱ्यांचे आंदोलन हे दहशतवाद्यांच्या हाती गेल्याचा शोध भाजप गुप्तचर यंत्रणेने लावला आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, लाल किल्ल्यावर धुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व कुणीएक दीप सिद्धू करीत होता. हा सिद्धू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आतल्या गोटातला माणुस असल्याचे समोर आले आहे. हे महाशय गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसून बंडाची, चिथावणीची भाषा करीत होते, असे राजेश टिकैत वगैरे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन साठ दिवसांपासून शांततेत सुरू आहे. देशातील असलेले कृषी कायदे रद्द करा ही मागणी घेऊन शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसून आहेत. तरीही शेतकरी आंदोलनात फूट पडलेली नाही आणि केंद्र सरकारला हात चोळत बसावे लागले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानी आहेत असा सापही सोडून झाला, पण शेतकरी शांत राहिले असा टोमणा सामनातून केंद्र सरकारला लगावण्यात आला आहे.

- Advertisement -

पंजाबच्या मागे संपुर्ण देश उभा ठाकला आहे. तिरंग्याचा अपमान केल्याची बोंब भाजप पुरस्कृत प्रसारमाध्यमांनी केली. पण खोटारडेपणाचा बुरखा अखेर फाटलाच. लाल किल्ल्यावर गोंधळ करणाऱ्यांचे नेतृत्व जो कुणी सिद्धू करत होता, त्याचा संबंध भाजपशी आहे. पोलिसांवर जे हल्ले केले त्यांना जेरबंद करून खटले चालवायला हवेत. कायदा हातात घेणाऱ्यांची गय सरकारने करू नये. पण साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांना जाब विचारणारे कोणी आहे की नाही ? तीन कृषी कायदे म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य नाही. कुणाचे हित त्यात गुंतले आहे असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. या हितासाठीच शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे. हे देशहिताचे नाही असेही अग्रलेखात नमुद करण्यात आले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -