जव्हार : १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते.या वर्षी देखील जनजाती विकास मंच यांच्या वतीने जव्हार गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार डॉ. संदीप धुर्वे आणि कॅबिनेट मंत्री विवेक पंडित उपस्थित होते. जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी संस्कृती जतन करणार्या गुणवंताचा सत्कार देखील करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच, महाराष्ट्र शासनाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र आदरांजली अर्पित केली. स्वामी विवेकानंद यांच्या उक्तीप्रमाणे किती जगलात याला महत्त्व नाही,कसे जगलात याला महत्त्व आहे, असे मत फडणवीस यांनी मांडले.
अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये इंग्रजांना हादरून सोडणार्या बिरसा मुंडांनी आदिवासींचे शोषण करणार्या ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारला. आदिवासींची जमीन व्यवस्थाही विस्कळीत होत होती. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन केले. 1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. जेव्हा ते आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी सरदार चळवळीत सामील झाले. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटीशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनी बिरसा मुंडा यांच्यावर ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाचे नियोजन स्वागताध्यक्ष, जव्हार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, पालघरच्या जनजाती मंचाचे अध्यक्ष नरेश मराड, दामोदर थाळकर, दीपक काकारा, राजेश कोरडा यांच्या द्वारे करण्यात आले होते.
शोभायात्रेचे आयोजन
बिरसा मुंडा यांची जयंती “आदीवासी गौरव दिवस” म्हणून साजरा केली जाते.येणार्या पिढीकडे आपला सांस्कृतिक वारसा पोहचविणे व राष्ट्रीय गौरवास प्रोत्साहित करणे,हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला ८० आबालवृद्ध बिरसा मुंडा यांच्या वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. हातात धनुष्यबाण घेऊन आदिवासी बांधव- भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक तारपा, ढोल इतर वाद्य वाजवून बिरसा मुंडा यांस अभिवादन केले.