मोखाडा । वन्यजीव कायद्याचे संरक्षण लाभलेले व वनविभागाच्या अनुसूची एकमध्ये समाविष्ट असलेल्या बिबट्या, गिधाड यांसारख्या वन्यजीवांची शिकार करत बिबट्याच्या कातडीची तस्करी करताना रंगेहाथ इगतपुरी वनविभागाच्या सापळ्यात अडकलेल्या चौघा तस्करांना सोमवारी (दि. १२) न्यायालयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयात वनविभागाकडून गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता वनकोठडीची मुदत वाढवून मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला.१७ लाखांत कातडीचा सौदा करण्याची तयारी या तस्करांनी दाखवून कातडी घेऊन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जव्हार-मोखाडा रस्त्यावरील आंबोली फाटा येथे ते आले होते. यावेळी सिनेस्टाईलने वनक्षेत्रपाल केतन बिरारीस यांच्या पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेतले होते. यावेळी तावडीतून निसटून जाण्यासाठी दगडांनी वनकर्मचार्यांवर चौघांनी हल्ला चढवून जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे शासकीय रिव्हॉल्व्हरमधून बिरारीस यांना हवेत गोळीबार करावा लागला होता. संशयित प्रकाश लक्ष्मण राऊत (४३, रा. रांजणपाडा), परशुराम महादू चौधरी (३०, रा. चिंचुतारा), यशवंत हेमा मौळे (३८), दत्तु हेमा मौळे (३८, दोघे रा.कुडवा) यांना अटक केली होती.
दत्तू याने गिधाडाचीही शिकार अंधश्रद्धेपोटी हरसूलच्या जंगलात येऊन केल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली आहे. या चौघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १२) वनकोठडी सुनावली होती. वनकोठडीची मुदत संपल्याने तपासी अधिकारी सहायक वनसंरक्षक अनिल पवार, केतन बिरारीस यांनी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात सरकार पक्षाकडून सात दिवसांची वनकोठडीची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली. परंतु आरोपींना १५ हजारांच्या जातमुचलक्याची रक्कम भरावी, संशयित आरोपींनी साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, वन गुन्ह्याच्या तपासात अडथळा आणू नये, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तपासात किंवा पुराव्याशी छेडछाड करू नये,संशयित आरोपींनी तपासात वन अधिकार्यांना सहकार्य करावे, संशयित आरोपींनी त्यांच्या ओळखीचा व रहिवासी पत्त्याचा पुरावा सादर करावा,यापुढे अशा प्रकारचा कोणताही गुन्हा कधीही करू नये या अटीवर जामीन देण्यात आला.