ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात आलेले अपयश आणि खेळाडूंना झालेल्या दुखापतींचा फटका भारताला बसला. ऑस्ट्रेलियाच्या ३३८ धावांचे उत्तर देताना भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाली. यानंतर फलंदाजी चांगला खेळ केल्याने तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात २ बाद १०३ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी होती. दिवसअखेर मार्नस लबूशेन (नाबाद ४७) आणि स्टिव्ह स्मिथ (नाबाद २९) खेळपट्टीवर होते.
After losing their openers, Steve Smith and Marnus Labuschagne survived the final session to take Australia to 103/2 at stumps.
The hosts have extended their lead to 197.#AUSvIND scorecard ⏩ https://t.co/Zuk24dsH1t pic.twitter.com/EjbXndYllk
— ICC (@ICC) January 9, 2021
त्याआधी तिसऱ्या दिवशी २ बाद ९६ वरून पुढे खेळणाऱ्या भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा २२ धावांवर पॅट कमिन्सने त्रिफळा उडवला. हनुमा विहारी केवळ ४ धावांवर धावचीत झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी ५३ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पंत (३६) आणि पुजारा (५०) सलग दोन षटकांत माघारी परतल्याने भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला.
यानंतर रविंद्र जाडेजा (नाबाद २८) वगळता भारताच्या तळाच्या फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. भारताचे तीन फलंदाज धावचीत झाले. तसेच फलंदाजी करताना पंत आणि जाडेजा यांच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे जाडेजा दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही.